चितळेबाबा साधक अनुभव
श्री. नारायण विठ्ठल गोखले.
माझ्या आयुष्यात आलेले, घडलेले, घडवले गेलेले संबंध, घटना, मी अक्षर रुपाने निवेदन करण्याचा प्रयत्न करत आहे.
चितळेबाबांची व माझी पहिली भेट सन 1982 जानेवारीच्या सुमारास हवाईदलातील एका स्टेशन वर झाली. बाबांचे गच्च भरलेले शरीर, प्रचंड शक्ती व त्यांच्या सत्यवचनी स्वभावामुळे आमची लवकरच मैत्री झाली. अरे-तुरेच्या संबोधनाचे नाते निर्माण झाले. तरीही इथे मी आदरार्थी संबोधनाने त्यांचा उल्लेख करणार आहे. असो.
त्यानंतरच्या काळात आमचे थोरले चिरंजीव रवीला, आर्मीत कमिशन मिळाले होते. दुसरा मुलगा विवेक एम. टेक करीत होता. निवृत्तीनंतर धाकटी मुलगी-कल्पना-सह आम्ही पुण्याला निघालो होतो. त्यावेळी बाबा म्हणाले, ‘चिंता करू नको आपली परत भेट होईल. जा, तू तिथे जाऊन घर घेणार आहेस. ते घे.’ बाबांनी सांगितल्यासारखे आम्ही सध्या राहात असलेले त्रिदल सोसायटीतील घर (फ्लॅट) आकस्मिकरित्या मिळाला. स्वतःच्या घराचे आमचे स्वप्न आणि बाबांचे बोल खरे ठरले.
आमचा संसार खुशीत सुरू होता. मुलांचे विवाह होऊन त्यांनी संसार थाटले. पण चि. कल्पनाचा लग्नाचा योग सतत प्रयत्न करूनही प्रत्येक वेळी काही न काही अडचणी येऊन जुळून येत नव्हता. त्यामुळे आम्ही उभयता फार काळजीत होतो. आता तर हवाईदलातील सेवेतून निवृत्त होऊन 9 वर्षे झाली होती.
सन 1995 मधे एका संध्याकाळी बाबा (त्यांना आम्ही बाबा भूतनाथ म्हणून पुर्वीपासून संबोधतो.) अक्षरशः भुतासारखे प्रकटले! आम्ही प्रेमाने मिठ्या मारल्या. त्यांनी माझ्या चरणावर डोके ठेवले. तेंव्हा मला एकदम गदगदून आले. मी काही तसा मोठा नाही पण बाबांहून वयाने वरिष्ठ होतो एवढेच. (बाबा जेंव्हा नतमस्तक होतात तेंव्हा त्या भावना शब्दांनी सांगता येत नाहीत. त्या अनुभवाव्या लागतात. विचार सुरू होतात. न संपणारे....!)
कल्पनाचा विवाह घ़डवला आणि आईचा मृत्यू पुढे ढकलला!
आम्ही आमची काळजी त्यांच्या कानावर घातली. त्यावेळी बाबा हसले अन् म्हणाले, ‘अरे कल्पनाच्या लग्नाची काळजी करू नकोस. आता मी आलोय न, लवकरच तिचे लग्न जमेल.’ आणि तिचे लग्न अगदी दोन महिन्यात झाले देखील! सध्या ती पुण्यात असते. तिच्या लग्नाच्यावेळी, ‘कल्पनाला एकच अपत्य असेल. दुसरे असणार नाही’ असे म्हटले होते. बाबा म्हणाले होते, ‘मी सांगतो ते सत्य आहे. मात्र त्यातही असत्य दडलेले आहे. कारण प्रभू काहीही करायला समर्थ आहेत.’ पण बाबांनी म्हटल्यासारखे तिला एक मुल आहे ते सध्या दहावीत आहे.
गुरूवारच्या आरतीला मी त्यांच्या सोबत बसून पुजेची सर्व तयारी करून देत असे. 1996ची गोष्ट असेच एकदा मी गुरुवारच्या आरतीला गेलो असता बाबांना म्हणाले, ‘तुझ्या घरी काही अदभूत घडत आहे. त्यात तुझ्या आईचा मृत्यू दिसतोय’. मी प्रचंड घाबरलो. माझी अवस्था पाहून बाबा म्हणाले, ‘मी एक करू शकतो, तिचा मृत्. तीन महिने पुढे ढकलू शकतो’ आणि बाबांनी त्याप्रमाणे 16 मे पर्यंतची तारीख दिली. त्यानंतर माझ्या आईचे देहावसान 11 मे 1996ला झाले. अन् बाबांचे बोल खरे ठरले.
पोटाचा आजार व गाईच्या शेणाचा लेप!
साधारण 2005ची गोष्ट. मी एकाएकी आजारी पडलो. प्रचंड थकवा आल्यामुळे पुणे हॉस्पिटलला भरती झालो. सर्व उपचार व टेस्ट्स करूनही डॉक्टरना निदान करता येत नव्हते. त्यांनी बोन मॅरो ही करून पाहिला. त्यात त्यांना पोटातील मोठ्या आतड्याला टीबी झालाय असल्याचे निदान केले. औषधोपचार सुरू झाला. पण प्रकृती दिवसेंदिवस खालावतच चालली होती. शरीरातील हिमोग्लोबिन चारवर आले होते. दिवसभर पोटात 2-4 चमचे अन्न म्हणून बळजबरीने घातले जात होते. या आजारपणामुळे अंथरुणाला खिळून होतो. उठता-बसता येईना. काय झालेय ते ही कळेना. अशातच डॉक्टरांनी आमच्या सौंना सांगितले की प्रकृती जास्त बिघडली आहे. आता काही खरे नाही! तुम्ही तुमच्या नातेवाईकांना बोलावून घ्या! ते ऐकून पत्नी पुतळ्यासारखी निस्तब्ध झाली. ती तशी एकटी होती. मोठा मुलगा हजर नव्हता. धाकटा परदेशात दौऱ्यावर गेला होता. नंतर सावरून तिने बाबांना फोन केलान, ‘आता काय करू? म्हणून, करुणा भाकली. माझ्या आजाराची सर्व माहिती तिने त्यांना सांगितली. मग बाबा म्हणाले, ‘घाबरू नका. मी त्यांना घरी आणेन. त्यापुर्वी एक काम करा. गोखले साहेबांना आहे त्या परिस्थितीत तसेच हॉस्पिटलमधून बाहेर काढा. दवाखान्यातील सर्व औषधे वाटेत वाहत्याप्रवाहात सोडून द्या. मग तुमच्यापैकी कोणाला तरी गाईचे शेण घेऊन माझ्याकडे पाठवा.’
बाबांनी सांगितल्यासारख्या सुचनांप्रमाणे आम्ही माझ्या मुलीकडे आलो. पत्नीचे बंधू श्री.शाम साठे गाईचे शेण घेऊन बाबांकडे गेले. बाबा आकाशाकडे पाहून हसले व काही मंत्रून ते मला डोक्याच्या केसांपासून ते पोटापर्यंत लेप देऊन संपुर्ण अंगावर पांघरुण घालायला सांगितले. त्यानंतर मी दोन दिवसांनी थोडा शुद्धीवर आलो. तेंव्हा मला खरेच बरे वाटू लागले आणि पुढे तर जशी जादूच झाली! 3-4 आठवड्यात मी आपोआप कोणत्याही औषधाविना पुर्णपणे स्वस्थ झालो! घरातच चालायला फिरायला लागलो.
माझे तिरुपती यात्रा भ्रमण
बाबांच्या आशीर्वादाने मी बरा झालो असताना बाबांनी आज्ञा केली की जा आता देवाचे दर्शन घेऊन या. तुझा काळ आला होता व पण वेळ आली नव्हती. त्याप्रमाणे आम्ही मुलांसह बालाजीच्या दर्शनला गेलो. त्यावेळी माझ्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण 5 ते 6 इकतेच होते. WBC कमी होत्या. त्याही परिस्थिती आम्ही तिरुपतीला पोहोचलो. त्यावेळी मी गडाच्या पायऱ्या पासून ते थेट वर 7-8 किमी अंतर स्वतःच्या पायाने कसा चढून गेलो ते सांगणे अशक्य आहे. पण एवढे मात्र खरे की या प्रवासात बाबा माझ्या फारच जवळ आहेत असे जाणवत होते. त्यांचा आवाज, त्यांचा देह दिसत होता. पण ते काय कोण होते. ते कळत नव्हतं. अशा प्रकारे तिरुपतीचे दर्शन घेऊन आम्ही परतलो, पुढील चार महिन्यात पुर्णपणे बरा झालो. मग मला झालेला आतड्या टीबी गेला कुठे असा मला प्रश्न पडतो. आणि बाबांची आमच्यावर असलेली कृपा याची जाणीव प्रकर्षाने होते.
बाबा म्हणजे एकसाऱखे सिटरेट-बिडी पिणारे, सतत हसणारे असे कधीही समजून येऊ शकणारे एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे असेच वाटते. असे अजून पुष्कळ अनुभव आहेत ते सविस्तर निवेदन करणयातचा प्रयत्न परत केंव्हातरी करेन.
।।अल्लख निरंजन।।